सातारा हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आह, असे म्हणतात. हे शहर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगलोर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. सातारी कंदी पेढा जगप्रसिद्ध आहे. तसेच या शहराला ऐतिहासिक वारसा ही लाभलेला आहे. पूर्वी हे शहर मराठ्याची राजधानीही होते.
सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सातारा शहरात झाला. त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर मराठ्यांची राजधानी होते. सातारा
सातारा शहरचे जगाच्या नकाशावरचे स्थान १७.६९१३९° उत्तर अक्षांश, ७४.०००७२° पूर्व रेखांश असे आहे.
सातारा शहर अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. सातारा शहराच्यादक्षिणेकडे अजिंक्यतारा, उत्तरेकडे पेढयाच्या भैरोबाची टेकडी, पश्चिमेकडे यवतेश्वराचाडोंगर व पूर्वेकडे जरंडेश्वराचा डोंगर या टेकड्यांनी वेढले आहे. शहराजवळून कृष्णा ववेण्णा या नद्या वाहतात. माहुली इथे या दोन्ही नद्यांचा संगम होतो. सातारा शहराच्या पश्चिमेकडील कासचे पठार वनौषधींसाठी प्रसिद्ध आहे. शहरातून ह्याच टेकडीकडे पाहिल्यास मृत ज्वालामुखीचे मुख दिसते. सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणारी ही डोंगराची रांग पश्चिमघाटात मोडते. त्यामुळे सातार्यात पावसाचे प्रमाण खूप आहे. सातार्यात प्रतिवर्षी साधारण १००० मिलिमीटर एवढा पाऊस पडतो.
शाहुनगर
● सातारा शहराची स्थापनाचे संभाजीचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली. ● औरंजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहूमहाराजांनी सातारच्या किल्ल्यावर (अजिंक्यतार्यावर) आपल्या राज्याभिषेक करवून घेतला व सातारच्या किल्ल्यावरूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हलवण्यास सुरुवात केली. अडचणीत सापडलेले मराठा साम्राज्य शाहूमहाराजांच्या समयसूचक धोरणांमुळे हळू हळू मोकळा श्वास घेऊ लागले. विखुरलेले एक एक मराठा सरदार एकत्र करून त्यांच्यात स्वराज्याची ऊर्मी नव्याने जागृत करत शाहूमहाराजांनी मराठा स्वराज्याला मराठा साम्राज्याचे स्वरूप देण्यास सुरुवात केली. मराठा साम्राज्याचा चहूबाजूला जसाजसा विस्तार होऊ लागला तसातासा सातारच्या किल्ल्याचा परिसर प्रशासनच्या दृष्टीने कमी पडू लागला व त्यातूनच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली आणि शहराची मुहूर्तवेढ रोवत शाहूमहाराजांनी मराठा स्वराज्याच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वराज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आणली. ● सातारा शहराची अर्थात शाहूनगरीची रचना व त्यातील भागांची नवे शाहूमहाराजांच्या आमदनीची आठवण करून देतात. राजकीय महत्त्व संपले तरीही मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी म्हणून सातार्याचा अभिमान महाराष्ट्रीयांना आजही वाटतो. शाहूनगरची स्थापना इ.स. १७२१ च्या सुमारास झाली. शाहूमहाराजांच्या दिनांक २८ मार्च १७२१ च्या पत्रात तातडीने वाडा बांधल्याचा उल्लेख आहे. शाहूमहाराजांच्या व पेशव्यांच्या ज्या भेटी होत त्या रोजनिशीत नोंदल्या आहेत त्यावरून शहर रचनेच्या कालावधीचा अंदाज लागतो. डिसेंबर १७२० च्या सुमारास श्रीमंत बाजीरावांनी सातारा किल्यावर शाहूमहाराजांची भेट घेतली. त्यानंतर सात-आठ महिन्यांच्या भेटी माची किल्ले सातारा येथे झालेल्या आहेत. त्यापुढे ऑगस्ट १७२१ ला शाहूनगरनजीक केल्ले सातारा येथे श्रीमंत बाजीरावांनी शाहूमहाराजांची भेट घेतली असा उल्लेख आहे. ● शाहूनगरालच हल्ली सातारा असे म्हणतात. शाहूमहाराजांनी स्वतःकरता दोन राजवाडे बांधले. येवतेश्वरच्या डोंगरातून नळ बांधून पाणी आणले. जागोजागी हौद तलाव बांधले त्यांनी शाहूनगरच्या वैभवात जास्तीत जास्त भर घालण्याचे प्रयत्न केले. ● शाहूनगरची रचना व प्रतिष्ठा शाहूमहाराजांच्या नजरेखाली पुष्कळ वाढली. व्यापार उद्योग वाढला. नवीन सावकार निर्माण झाले. सुखानंद, सुमेरगिरी, बन्सीपुरी अशा परदेशी सावकारांची वस्ती होणे सुरू झाले. मराठ्यांचा बाह्यउद्योग पसरत गेला, त्याबरोबर उत्तरेकडचे हिंदी लोक, वकील, व्यापारी, हुन्नरी कलावंत अशी अनेक माणसे दक्षिणेत आल्यामुळे शाहूनगरातील दळणवळण वाढून नगराचे जीवनस्तर उंचावले. त्याचबरोबर शाहूनगरचे वैभवसुद्धा विस्तारले. ● महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर वसवताना शाहूमहाराजांनी तख्ताचा वाडा, रंगमहाल, पीलखाना, अदालतवाडा, बेगम मस्जिद असा अनेक भव्यदिव्य इमारतींची उभारणी केली.
१) तख्ताचा वाडा : हल्ली जिथे शाहू उद्यान आहे तिथे शाहूमहाराजांचा वाडा होता. तिथेच त्यांचे सिंहासन होते. म्हणून त्याला तख्ताचा वाडा म्हणत. जवळच लागून असलेल्या विहिरीस तख्ताची विहीर म्हणत. सध्या एक तटबंदीची भिंत व वाड्याच्या भिंतीचा अवशेष अढळतो.
२) रंगमहाल: रंगमहाल ही वास्तू अदालतवाड्याच्या पूर्वेस सुमारे २०० मीटर अंतरावर आहे. मूळ इमारत ३० मीटर लांब व १५ मीटर रुंद असून तिला ४५ मीटर रुंदीची नवीन इमारत जोडून बांधली आहे. मूळ इमारत ३ मजली होती. शाहूमहाराजांच्या राण्यांचा राणीवसा येथे होता म्हणून या इमारतीस रंगमहाल असे नाव देण्यात आले. राजमाता येसूबाईसाहेब देखील याच वाड्यात राहत असत. १८७४ साली लागलेल्या आगीत संपूर्ण रंगमहाल बेचिराख झाला. सध्या या वाड्याचा अर्धा भाग कूपर कारखाण्न्याच्या ताब्यात आहे.
३) अदालतवाडा : अजिंक्यतार्याच्या पायथ्याशी बोगद्याकडे जाणार्या रस्त्यावर शाहूमहाराजांच्या कालावधीपासून अस्तित्वात असलेल्या वस्तूचा महाराज न्यायालयासारखा उपयोग करीत. ही इमारत ६७. मीटर लांब व ४८ मीटर रुंद आहे. १८७६ पर्यंत या इमारतीचा उपयोग दिवाणी न्यायालय म्हणून केला जात असे. त्यानंतर मात्र नवीन राजवाड्याचा वापर न्यायालयासाठी होऊ लागला. सध्या अदालत वाडा हे सातारा राजकुलाचे शिवाजीराजे भोसले यांचे वसतिस्थान आहे.
४) बेगम मस्जिद: औरंजेबाची मुलगी बेगम झीनतउन्निसा हिने शाहूमहाराजांचा ते कैदेत असताना चांगला सांभाळ करून त्यांचे धर्मांतरण होऊ दिले नव्हते. झीनतउन्निसा बेगम १७२१ साली वारली. तिच्या स्मरणार्थ शाहूमहाराजांनी अदालत वाड्याच्या जवळच एक मस्जिद बांधली. आज त्या जुन्या मस्जिदीच्या जोत्यावर नवीन मशीद उभारली आहे.
सातार्यात म्हणजेच शाहूनगरमध्ये अनेक वाडे बांधण्यात आले होते. फत्तेसिंह वाडा, मंत्र्यांचा वाडा, शिर्के यांचा वाडा, पंडितरावांचा वाडा, तसेच मंगळवार पेठेत शाहूमहाराजांच्या पत्नी सगुणाबाई यांचा वाडा होता. तो वाडा आजही धनिणीची बाग म्हणून प्रसिद्ध आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा